पोलिसाने पोलीस ठाण्यातच स्वत:वर झाडली गोळी !
लातूर : पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या ठाणे अमलदाराने पोलीस ठाण्यातच सरकरी रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
कामाच्या तणावातून तसेच अन्य कारणाने आजवर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत पण पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना आत्महत्या करण्याची ही दुर्मिळ आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. किल्लारी पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार एस. एस. सावंत यांनी सरकारी रायफलचा वापर करून स्वत:वर गोळी झाडली. यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यातील एसएलआर रायफलचा वापर केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
गोळी झाडून आत्महत्या केलेले सावंत हे किल्लारी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कामावर होते. नाईक कृष्णा गायकवाड, मीरा जाधव हे कर्मचारीही यावेळीआपल्या ड्युटीवर होते. सावंत असे काही करतील याचा अंदाजही कुणाला आलेला नव्हता. सावंत यांनी पोलीस ठाण्यातील एसएलआर रायफल घेतली आणि आपल्या हनुवटीला लावून गोळी झाडली. रायफलमधून सुटलेल्या गोळीचा आवाज ऐकून पोलीस नाईक गायकवाड हे तातडीने धावून गेले त्यावेळी त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना दिली.
सावंत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यातून त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर येईल, त्यांच्या सुसाईड नोटमधील बाबीची पडताळणी करण्याचे काम पोलीस करीत आहेत. सावंत हे २०१७ साली निलंगा तालुक्यातील कासार शिरसी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी त्यांची निलंगा तालुक्यातील काही शैक्षणिक संस्थाचालक आणि काही राजकीय पक्षाच्या नेत्यांशी आर्थिक व्यवहार केले होते. सावंत यांनी त्यांना जवळपास ९ लाख रुपये उसनवार दिले होते. सदर रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली जात होती आणि यातून सावंत यांना मारहाण देखील करण्यात आली होती.
सदर घटनेची माहिती मिळताच लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असून या प्रकरणी काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून हळहळ देखील व्यक्त होऊ लागली आहे. त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यात कुणाकुणाची नावे समोर येतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना नेत्याचे नाव
मयत पोलीस कर्मचारी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील आहेत. त्यांच्या या आत्महत्या प्रकरणी जबाबदार असलेल्यात शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचे नाव असून सुमारे सात जणांचा यात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात फिर्याद देण्याचे काम सुरु झाले आहे.

0 Comments