बोरामणी परिसरातील (ता. दक्षिण सोलापूर) दावल मलिक दर्ग्याजवळील तलावात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
सोलापूर: बोरामणी परिसरातील (ता. दक्षिण सोलापूर) दावल मलिक दर्ग्याजवळील तलावात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रिदाना तौफिक पिरजादे (वय 35), यासीन हारूण शेख (वय 41) आणि हारूण सलीम शेख (वय 41) अशी मृतांची नावे असल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले. कुंभारी, नवीन विडी घरकुल परिसरातील तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. हे तिघेही देवकार्यासाठी बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे गेले होते. त्याठिकाणी देवकार्य संपवून घरी परत येताना दुपारच्या सुमारास दर्ग्याजवळील तलावात गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. जवळील लोकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले असता ते बेशुद्धावस्थेत होते. या बाबत त्यांनी तालुका पोलिसांना कळविले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण फुगे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले. त्यांनी परिस्थितीचा पंचनामा करून तिघांनाही पुढील उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली असून रात्री उशिरा तालुका पोलिसांत या दुर्दैवी घटनेची नोंद झाली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारी दुकाने, व्यापार बंद असतो. त्यानिमित्ताने देवदर्शन करून संध्याकाळ होण्यापूर्वी घरी परत येण्याच्या नियोजनाने कुंभारी, नवी विडी घरकुल परिसरातील दोन कुंटुंबातील सात-आठजण वाहनाने दावल मलिक दर्गा याठिकाणी गेले होते. दर्शन घेऊन जेवण केल्यानंतर तिघेजण हातपाय धुण्याच्या निमित्ताने जवळील तलावात गेले. त्यावेळी पाय घसरून तिघेही पाण्यात बुडाले. त्यांच्या सोबत गेलेल्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु, तिघांनाही पोहायला येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या कुटुंबियांचा जबाब नोंदविला जाणार आहे. कोणाची तक्रार असल्यास त्यानुसार पुढील तपास केला जाईल, अशी माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली.
0 Comments