शरद पवार सांगोला दौऱ्यावर , गणपतराव देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर आहेत . दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेणार आहेत . तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं . गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते . त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवार हे गणपतराव देशमुख यांच्या घरी जातील . तिथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील . गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर विविध पक्षीयांनी शोक व्यक्त केला होता .गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला . अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे . एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे . सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले . 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून , करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले . आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला . त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं .गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते , मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला . त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता . साधा माणूस गणपतराव देशमुख हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्वाधिक लोकप्रिय होते . 11 वेळा आमदार राहूनही त्यांची राहणीमान अत्यंत साधी राहिली आहे . एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे . त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची . माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती . सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता . त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले .केवळ दोनदा पराभव शेतकरी कामगार पक्ष राज्यात प्रभावहीन झाला आहे . तरीही देशमुख यांनी सांगोला मतदारसंघ राखला . या मतदारसंघातून ते तब्बल 11 वेळा निवडून आले . 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या देशमुखांना केवळ 1972 आणि 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला . 1972 मध्ये काकाळासाहेब साळुखे - पाटील यांनी त्यांचा पराभव केला . तर 1995 मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी त्यांना पराभूत केले . हे दोन पराभव वगळता देशमुख यांनी सातत्याने विजय मिळवला आहे . मात्र , प्रकृती आणि वय या दोन कारणामुळे 94 वर्षीय देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली नाही . अधिककाळ विरोधी बाकावर गणपतराव देशमुख सर्वाधिक काळ विधानसभेत राहिले असले तरी बहुतेक काळ ते विरोधी पक्षातच होते . 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले . त्यावेळी देशमुखांचा मंत्रिमंडळात समावेश झाला . त्यानंतर 1999मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला . तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता . हा अपवाद वगळता ते नेहमी विरोधी पक्षातच राहिले . तर मुख्यमंत्री झाले असते . पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूची 5 वी युवा संसद जानेवारी 2020 मध्ये पार पडली . या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते . यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला . 1999 मध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला . कारण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं . त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती . पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत , हेही दिसत होते . त्यावेळी शेकापचे तीन आमदार निवडून आले होते . तेव्हा गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही मुख्यमंत्री नको . गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा . असा विचार आला . त्यावर सर्व सहमतही होते . पण नंतर ते झालं नाही , असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता .
0 Comments