आबासाहेबांच्या प्रकृतीतील सुधारणा हा एक दैवी चमत्कारच आहे. जनतेच्या आशीर्वादाने त्यांची प्रकृती सध्या सुधारत आहे.
सोलापूर : आबासाहेबांच्या प्रकृतीतील सुधारणा हा एक दैवी चमत्कारच आहे. जनतेच्या आशीर्वादाने त्यांची प्रकृती सध्या सुधारत असून, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जिल्हा व तालुक्यातील सर्व जनतेने काळजी करू नये, असे आवाहन माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले. गणपतराव देशमुख यांच्यावर पित्ताशयाच्या खड्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मंगळवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होत होता. मात्र आज (बुधवारी) त्यांचे शरीर उपचाराला साथ देत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची तब्येत सुधारावी अशी प्रार्थना राज्यभरातून होत आहे. विविध पक्षांचे व संघटनांचे प्रमुख व पदाधिकारी सतत संपर्कात आहेत. आबांनी आयुष्यभर वंचित, शोषितांची सेवा केली असून या पुण्याईच्या जोरावर त्यांना दीर्घायुष्य लाभेल, अशी आशा शेकापचे नेते भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. अनिकेत देशमुख, त्यांचा मुलगा चंद्रकांत देशमुख व कुटुंबातील इतर सदस्य तसेच शेतकरी कामगार पक्षाची प्रमुख नेतेमंडळी अश्विनी रुग्णालयात उपस्थित आहेत. मंगळवारी दुपारी भाई गणपतराव देशमुख यांची तब्येत जास्तच बिघडल्याने काही अफवा पसरल्या व यानंतर राज्यभरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दरम्यान, गणपतराव देशमुख यांची प्रकृती ठीक नसल्याने व ती चिंताजनक असल्याच्या बातमीने राज्यभरात राजकीय, सामाजिक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सतत त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. राज्याच्या राजकारणातील ते महत्त्वाचे ज्येष्ठ नेते असून त्यांचे सर्वच राजकीय पक्षांशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. दरम्यान, पक्षातील प्रमुख सत्ताधारी नेते तसेच विरोधी पक्षातील पदाधिकारी सतत सोलापूरच्या संपर्कात असून ते भाई देशमुख यांच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती आता स्थिर व चांगली आहे. त्यांच्या तब्येतीत आणखी सुधारणा होत आहेत. आम्ही सर्व कार्यकर्ते अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहोत. कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. सर्व जनतेला व कार्यकर्त्यांना विनंती की सर्वांनी साहेब लवकर बरे होऊन घरी यावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य व शेकापचे कार्यकर्ते ऍड. सचिन देशमुख यांनी केले.
0 Comments