थकबाकी भरल्यावरच शेतकऱ्यांना वीज ! व्यापारी , घरगुती 15 हजार कनेक्शन कट सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांकडे महावितरणची चार हजार दोनशे कोटींची थकबाकी आहे.
सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांकडे 45 हजार कोटींहून अधिक थकबाकी असून, थबबाकी भरण्यासाठी महावितरणने (MSEDCL) त्यांना एप्रिल 2022 पर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत बिलातील काहीच रक्कम न भरलेल्या राज्यातील काही शेतकऱ्यांचे कनेक्शन कापले असून, आता ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यांना आता बिल भरल्याशिवाय जोडणी देऊच नका, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांकडे महावितरणची चार हजार दोनशे कोटींची थकबाकी आहे.त्यापैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी योजनेतून काही प्रमाणात थकबाकी भरली आहे. परंतु, दोन लाख शेतकऱ्यांनी अजूनही बिल भरलेले नाही. त्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पडळकर यांनी सांगितले. दुसरीकडे, शहर- ग्रामीणमधील जवळपास 15 हजार ग्राहकांनी व्यापारी व घरगुती वीजबिल भरलेले नाही. त्यांचे कनेक्शन कट करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. वाढलेल्या थकबाकीमुळे महावितरणसमोरील अडचणी वाढल्याने ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करताना अडचणी येत असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत सप्टेंबर 2020 पूर्वीच्या एकूण थकबाकीतील 50 टक्के रक्कम भरल्यास त्यांना पुढील 50 टक्के बिल आणि त्यावरील व्याज, दंड माफ केले जाणार आहे. परंतु, एप्रिल 2021 नंतरचे बिल त्यांना पूर्णपणे भरावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.घरगुती, व्यापारी (औद्योगिक) आणि शेतीपंपाची थकबाकी भरून घेतली जात आहे. आता बिलांचे वाटप केले असून शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांनी बिल भरून सहकार्य करावे. अन्यथा, बिल भरल्याशिवाय कट केलेले कनेक्शन जोडले जाणार नाही. ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर वाढीव बिलाच्या तक्रारींवर जागेवरच तोडगा लॉकडाउन काळात आणि सध्या महावितरणकडून वाढीव बिल दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यात काही ग्राहकांना गैरसमजही झालेला असतो. परंतु, ग्राहकांच्या तक्रारी वाढत असून बिल प्राप्त झाल्यानंतर किमान 30 टक्के ग्राहक वाढीव बिल आल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आता महावितरणने शाखा व उपविभागीय स्तरावर त्या तक्रारींचा निपटारा करण्याचे अधिकारी शाखा अभियंत्यांना दिले आहेत.
0 Comments