नवी दिल्ली राष्टीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी , त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली .
सिंधुदुर्गातील आजी - माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले . त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे . आमदार , खासदार , मंत्री , स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रमाणे पत्रकारदेखील समाजासाठी झटत असतात . सर्वस्व देत असतात . जीव धोक्यात घालत असतात . पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून , ओळखला जातो . या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असतानावारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो . त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी , या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते , वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली . या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रास्त आहे , हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे , तर राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या . त्याचप्रमाणे आपल्या या महामार्गावर जर कुणा पत्रकाराचा आपघाती मृत्यू झाला , तर त्याला पाच लाखाचा विमा देण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली . तसेच ही सवलत फक्त अधीस्विकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे , तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली .
0 Comments