एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; सोलापुरात हळहळजनक घटना
सोलापूर : मोबाईलच्या हट्टावरून आईने रागावल्याने नववीतील विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोलापुरात घडली आहे.
या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
ओम संतोष कारंडे (वय १५, रा. दयानंद कॉलेज परिसर, गुजर वस्ती) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना त्यांच्या राहत्या घरी घडली.
विशेष म्हणजे, घटनेच्या काही वेळ आधीच कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मामाच्या घरी मुलगी झाल्याने आनंद साजरा करण्यासाठी तो मिठाई घेऊन आला होता.
या दरम्यान, आई घरात मामाशी बोलत असताना ओमने बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मोबाईलसाठी होता हट्ट
ओम गेल्या काही दिवसांपासून मोबाईलसाठी हट्ट धरून होता. गुरुवारीही त्याने आईकडे मोबाईलची मागणी केली. मात्र, आईने नववीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोबाईल घेऊन देण्याचे आश्वासन देत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
आईने रागावल्याने संतापाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी नागरिकांच्या मदतीने त्याला खाली उतरवून तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सणाच्या दिवशीच काळजाचा ठोका चुकवणारी घटना
ओम हा एसव्हीसीएस शाळेत नववीत शिक्षण घेत होता. गुढीपाडव्याच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच जोडभावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी सकाळी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून नंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
पालकांसाठी महत्त्वाचा संदेश
मोबाईल हे केवळ साधन असले तरी त्याचा मुलांवर मानसिक परिणाम होत आहे. तज्ज्ञांच्या मते— मुलांशी दररोज संवाद साधा, फक्त अभ्यासापुरता नाही नकार देताना शांतपणे कारण समजावून सांगा अचानक बंदी न आणता वापराचे वेळापत्रक ठरवा मुलांना खेळ, वाचन, इतर उपक्रमात गुंतवा घरात ‘नो मोबाईल टाइम’ ठरवा
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संध्या काळे यांनी पालकांना मुलांच्या भावनांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन केले आहे.
⚠️ महत्त्वाची नोंद:
अशा घटना टाळण्यासाठी मुलांच्या वागणुकीत अचानक बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका. गरज भासल्यास त्वरित समुपदेशन घ्या. संवाद हाच सर्वात मोठा उपाय आहे.


0 Comments