रेल्वे बोगदा बंदचा कालावधी कमी करून कायमस्वरूपीची दुरुस्ती करा –
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख नागरिकांच्या सोयीसाठी बोगदा दुरुस्ती काम दर्जेदार करून लवकर पूर्ण करण्याच्या सूचना
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (तालुका प्रतिनिधी) :- सांगोला शहरातील सांगोला–मिरज रोडवरील रेल्वे बोगदा दुरुस्ती कामासाठी
बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असून हा बोगदा १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बंद राहणार आहे.
मात्र इतक्या मोठ्या कालावधीसाठी बोगदा बंद ठेवू नये आणि दुरुस्ती कालावधी कमी करून काम दर्जेदार करावे,
अशी मागणी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक , सोलापूर विभाग, सोलापूर यांचे कडे केली आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील सांगोला शहरातील सांगोला-मिरज रोडवरील रेल्वे बोगदा हा आपण दुरुस्ती साठी १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवणार
असल्याचे आपल्या निवेदनाद्वारे सांगण्यात आले. वारंवार बोगदा दुरुस्ती करूनही बोगद्याचे काम व्यवस्थित झालेले नाही.
सदरच्या रेल्वे बोगद्याची दुरुस्ती करणे आवश्यक असले तरी ही या निर्णयामुळे शहरातील
व तालुक्यातील नागरिकांची प्रचंड गैरसोय व अडचण होणार असून यामुळे नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागणार आहे.
यामुळे रेल्वे प्रशासना बद्दल नागरिकांच्या मनात त्रीव नाराजी निर्माण झाली आहे. तरी आपण जी रेल्वे बोगदा दुरुस्ती करणार आहात ती कमी वेळेत
व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी जेणेकरून नागरिकांना याचा नाहक त्रास होणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बोगदा बंद केल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक अडचणींना सामोरे जावे लागणार असून शालेय विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार आहे.
त्यामुळे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून बोगदा शक्य तितक्या कमी कालावधीत सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वे विभागाने दुरुस्तीच्या कामाचे नियोजन पुनरावलोकन करून कालावधी कमी करावा आणि आवश्यक असल्यास टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू ठेवावी,
नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
सांगोला शहरातील रेल्वे बोगदा दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयीची जाण ठेवत
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी तातडीने पुढाकार घेत रेल्वे विभागाकडे दुरुस्तीचा कालावधी कमी करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक प्रश्नांवर संवेदनशीलपणे लक्ष देत प्रशासनासोबत समन्वय साधून तातडीने पावले उचलल्याबद्दल आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे कौतुक होत आहे.


0 Comments