१३ वर्षीय विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, १५ दिवसांत चौथा विद्यार्थी बळी दिघंची (ता. आटपाडी) येथील
तेरावर्षीय स्वराज शिवाजी पुसावळे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
सहामाही परीक्षेतील अवघड पेपरमुळे मानसिक तणाव आल्याने आत्महत्येचे कारण असल्याचा अंदाज.
पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची चौथी घटना; तालुक्यात हळहळ व चिंतेचे वातावरण.
दिघंची (ता. आटपाडी) येथील तेरावर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
स्वराज शिवाजी पुसावळे (वय १३) असे त्याचे नाव आहे. पंधरा दिवसांतील शालेय विद्यार्थी आत्महत्येची तालुक्यातील चौथी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
स्वराज पुसावळे हा मलकापूर (ता. सांगोला) येथील एका खासगी शाळेत सातवीमध्ये शिकत होता. त्याचे वडील शिवाजी पुसावळे गावचे महसूल सेवक म्हणून काम करतात.
त्यांना एक मोठी मुलगी आणि मुलगा स्वराज होता. स्वराज शाळेला खासगी बस गाडीने रोज ये-जा करत होता. काल त्याचा सहामाहीचा पहिला पेपर झाला होता. तो अवघड गेला होता. त्यामुळे तो अस्वस्थ होता.
दरम्यान, आज (ता. ६) सकाळी पहाटेच त्याने घरात सर्वजण झोपेत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घरच्यांनी बघितल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला. नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. घटनास्थळी गर्दी केली होती.
आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तत्काळ हलवले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी दिघंची गावात अंत्यविधी केला.
या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत तीन महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
या सलग चौथ्या घटनेने तालुका हादरून गेला आहे. या आत्महत्येची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.


0 Comments