सांगोल्यात धुळीचे प्रमाण वाढले; शहरात खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे नागरिकांना कळेना; अपघाताचे प्रमाण वाढले
आजी-माजी लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प भुयारी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे शहरवासीयांना तोंड दाबून बुक्क्याचा मार
सांगोला/प्रतिनिधी - सांगोला शहरात सध्या सुरू असलेले भुयारी गटारीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नाही. शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत.
शहराचे वाटोळे होताना सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे नेते ठेकेदार स्थानिक असल्याने त्यावर आवाज उठवण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. शहराचे सर्व भागातील रस्ते उखडले आहेत.
खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे नागरिकांना कळेनासे झाले असून शहरवासीयांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.
भुयारी गटारीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. अर्थपूर्ण वाटाघाटीमुळे राजकीय नेत्यांसह अधिकारीही मूग घेऊन गप्प आहेत. शहराचे पूर्णपणे वाटोळे झालेले आहे. शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
नगरपालिकेत हम करे सो कायद्याप्रमाणे कामकाज सुरू आहे. कोणाचाच वचक राहिलेला नाही. शहरात कोविड प्रमाणेच नागरिक धुळीपासून स्वतःला वाचवण्यासाठी मास्कचा वापर करू लागले आहेत.
प्रत्येक नागरिकाच्या तोंडाला मास्क दिसत आहे. ठेकेदार हा सांगोल्यातील स्थानिक असल्यामुळे ते कोणालाच जुमानत नाहीत. मीही सांगोल्यातील आहे असे तक्रारदारांना बोलत असल्याचे समजते. नगरपालिकेचे सध्या असलेले
भुयारी गटारीचे काम अंदाजपत्रकात प्रमाणे नाही. ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रेटची कामे केली आहेत, तेथे कसलेच पाणी मारले जात नाही. कोणीही अधिकारी सुरू असलेल्या कामांना भेटी देत नाहीत.
विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत निवडून आलेल्या व पराभूत झालेले उमेदवार साधे या भुयारी गटारीची पाहणी करण्यासाठी फिरकलेसुद्धा नाहीत.
प्रत्येक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पाडून ठेवले आहेत. धुळीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून समिती नेमून चौकशी करणे गरजेचे आहे.
शहरात अंदाजपत्रकाप्रमाणे भुयारी गटाचे काम होत नाही अशा अनेक तक्रारी नागरिक करत आहेत. परंतु नगरपालिका प्रशासनास राजकीय पक्षाचे नेतेमंडळी अर्थपूर्ण वाटाघाटीमुळे प्रत्यक्ष कामांची पाहणी करण्यासाठी व सुरू असलेल्या कामांची चौकशी
करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. एवढे मोठे शासनाने भुयारी गटारीसाठी निधी दिला त्या पद्धतीने कामकाज होत आहे का नाही, हे पाहणे त्या त्या भागातील नागरिकांचे काम आहे.
नागरिक या निकृष्ट कामाबाबत बोंबा मारीत आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. परंतु वरिष्ठ पातळीपर्यंत अर्थपूर्ण वाटाघाटीमुळे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त भ्रष्टाचार हा या भुयारी गटारीच्या कामात आहे. राजकीय वरदहस्त ठेकेदारावर असल्याने आमचे कोणी काही करू शकत नाही या अविर्भावात सर्वजण आहेत.
परंतु या सर्व कामाची शासनाने समिती नेमून अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नाही त्यामुळे याची चौकशी करूनही संबंधित ठेकेदारांसह अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
0 Comments