उमेदवारांनो ! सरपंच पदासाठी व सदस्यांसाठी खर्चाचे लिमिट किती? मर्यादा ओलांडल्यास 'ही' कारवाई केली जाणार
सोलापूर जिल्ह्यात १८९ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून छाननी, अर्ज माघार घेणे, चिन्हांचे वाटप, मतदान, मतमोजणी ही प्रक्रिया अद्याप बाकी आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवारांना पावणेदोन लाखांपर्यंत तर सदस्यपदाच्या उमेदवारांना ५० हजारांपर्यंतची खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे.
ही मर्यादा ओलांडल्यास अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचे निवडणूक कार्यालयाने सांगितले आहे.
गावात सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, विकास कामांचा आराखडा तयार करून त्याचे प्रस्ताव पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे पाठवणे, त्याचा पाठपुरावा करून मंजूर करून घेणे,समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे आणि करवसुली करणे, अशी कामे ग्रामपंचायत करते.
जशी राज्याच्या कामांची यादी आणि अधिकार सांगणारी राज्यसूची असते, केंद्राची केंद्रसूची असते अगदी त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे अधिकार, मर्यादा आणि कर्तव्ये सांगणारी ग्रामसूची असते.
दि.२ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करणे, दाखल अर्जाची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
कोणत्या तालुक्यात किती ग्रा. पं. निवडणूक
मंगळवेढा - १८, मोहोळ - १०, अक्कलकोट - २०, पंढरपूर - ११, बार्शी - २२, माढा - ०८, माळशिरस - ३५, उत्तर सोलापूर - १२, दक्षिण सोलापूर - १७, सांगोला - ०६, करमाळा - ३०
एकूण - १८९
खर्चाची मर्यादा कोणाला किती?
सरपंच पदासाठी खर्चाची मर्यादा
- ७ ते ९ सदस्य - ५० हजार, ११ व १३ सदस्य - १ लाख, १५ ते १७ सदस्य - १ लाख ७५ हजार
सदस्य संख्या खर्च मर्यादा
७ व ९ - २५ हजार, ११ व १३ - ३५ हजार, १५ व १७ - ५० हजार खर्चाची मर्यादा ओलांडल्यास अपात्रतेची कारवाई ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचे उमेदवार व सदस्यपदासाठी निवडणुकीस उभारलेल्या उमेदवाराने खर्चाची मर्यादा ओलांडल्यास त्यांच्यावर निवडणूक शाखेकडून अपात्रतेची कारवाई करण्यात येते.
आतापर्यंत खर्चावरून कोणत्याही उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई झाली नाही, मात्र आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाई मात्र निश्चित होते, असे सांगण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावरील पक्षांचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. दरम्यान, स्थानिक आघाड्यांना जास्त महत्त्व असते. शिवाय व्यक्ती कोण आहे? यालाही फार महत्त्व दिले जाते. शिवाय अनेक गावांत भाजपविरुद्ध शिवसेना, तसेच काही गावांत भाजप-राष्ट्रवादी एकत्र असल्याचेही दिसून येत आहे.
0 Comments