Breaking News

हिम्मत असेल तर ---------, उद्धव ठाकरे यांचे खुले आव्हान

 हिम्मत असेल तर ---------, उद्धव ठाकरे यांचे खुले आव्हान 

मुंबई : "हिम्मत असेल तर निवडणुका घेवून दाखवाच" अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असून राज्याचे लक्ष राजकीय घडामोडीकडे केंद्रित झाले आहे. सुरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवा ते मुंबई या सगळ्याच घडामोडी राज्याने पहिल्या आणि प्रचंड नापसंती देखील व्यक्त केली. अखेर भारतीय जनता पक्ष आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांनी मिळून सरकार स्थापन केले आणि विधानसभा अध्यक्ष ठराव १६४ विरुद्ध १०७ अशी जिंकली देखील आहे. 


आज आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आणि तोही बहुमताने जिंकला आहे. न्यायालयातील लढाई अद्याप बाकी आहे त्यामुळे ११ जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नव्या जोमाने पक्षबांधणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या दिवसांपासूनच ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकचा धडाका लावला आहे.


ठाकरे यांनी तळापर्यंतच्या शिवसेना पदाधिकारी तसेच नेते यांच्याशी संपर्क सुरु केला असून ते पुन्हा शिवसेना भवनात बसून पक्ष संघटना मजबूत करीत आहेत. आज त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांची बैठक घेतली.  "शिवसेनेला संपविण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असून मनमानी पद्धतीने विधानसभा चालविणे हा घटनेचाच अपमान आहे.  


 हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेवून दाखवा !" असे खुले आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिले आहे.  लढायचे असेल तर सोबत रहा, आम्ही चुकत असलो तर जनता आम्हाला घरी बसवेल, तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. असेल हिंमत तर मध्यावधी निवडणुका घ्या" असेही ठाकरे म्हणाले.


घटनेचा अपमान होतोय !

सद्या जे काही सुरु आहे ते आपल्या घटनेला धरून होत नाही, डॉ. आंबेडकर यांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु असून घटनातज्ञांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, विधानसभा मनमानी पद्धतीने चालविणे म्हणजे घटनेचा अपमान असून शिवसेनेला संपविण्याचा भाजपाचा डाव आहे. असले खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, असेल तुमची हिंमत तर मध्यावधी निवडणुका घेवूनच दाखवा' असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी दिले आहे.  


सरकार सहा महिन्याचे !

नव्याने आरूढ झालेले शिंदे सरकार हे सहा महिने टिकेल असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कालच म्हटले आहे. शिंदे सरकार पाच ते सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही, मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा. या नव्या सरकारमध्ये नाराजांची मोठी फौज असून मंत्रीमंडळ विस्तारानंतर ही नाराजी समोर येईल त्यामुळे बंडखोरी करून गेलेले अनेक आमदार स्वगृही परत येतील. सरकार पडले तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागा अशा सूचना देखील शरद पवार यांनी आपल्या पक्षात दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments