“मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची थट्टाच केली”, राष्ट्रवादीकडून टोल वसुलीचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर आल्यानंतर पंढरपुरला विठरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलीमाफी दिली जावी, याबाबत निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी आदेश दिल्यानंतर देखील वारकऱ्यांकडून टोल घेतला जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी विठुरायांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची थट्टाच केली, असा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.
“हिंदुत्वाचा जयघोष करुन सत्तेत आले आणि वारकऱ्यांना दिलेलं पहिलंच आश्वासन फोल ठरलं. मुख्यमंत्र्यांची टोलमाफीची घोषणा हवेतच विरली,” असा टोलाही राष्ट्रवादीने लगावला आहे. राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटलं की, “आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोल माफीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र प्रत्यक्षात वारकऱ्यांकडून टोल वसुली सुरूच आहे. या निर्णयाद्वारे मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या भेटीस निघालेल्या वारकऱ्यांची थट्टाच केली आहे.”
“पंढरपूरला जात असताना अनेक ठिकाणी वारकऱ्यांकडून टोल वसुली केली जात असल्याचं व्हिडीओंद्वारे समोर आलं आहे. त्यामुळे घोषणांची खैरात तर झाली पण अंमलबजावणी शून्य असे चित्र आहे,” अशी टीकाही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये टोलनाक्यावरील कर्मचारी वारकऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांकडून टोलमाफीबाबत जारी करण्यात आलेल्या परिपत्रक दाखवा, अशी मागणी करत आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा आदेश दिला असला तरी प्रत्यक्षात वारकऱ्यांकडून टोलवसुली केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.


0 Comments