Breaking News

सोलापूर जिल्ह्यासह राज्यात आजपासून तीन दिवस पाऊस !

 सोलापूर जिल्ह्यासह राज्यात आजपासून तीन दिवस पाऊस !

सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात आजपासून तीन दिवस पावसाचे असून काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाउस होण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. 

यावर्षी मुबलक पाऊस होण्याचा अंदाज सर्वच हवामान विभागाने दिला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस होईल असा देखील अंदाज दिला होता परंतु जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जुलै महिना आता अंतिम टप्प्यात आहे. 

जुलै महिन्यात राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आणि नद्या नाले तुडुंब भरून वाहात राहिले, विविध धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली त्यामुळे चांगलाच दिलासा लाभला आहे. राज्यात झालेल्या पावसामुळे पुराची परिस्थिती देखील निर्माण झाली आणि यात काहीना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली पण आता पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

हवामान अंदाजासाठी परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा चांगलाच लौकिक असून शेतकरी बांधव या अंदाजावर विश्वास ठेवत असतात. त्यांनी व्यक्त केलेल्या सुधारित अंदाजानुसार राज्यात आज २३ जुलै पासून २५ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असून आजपासून तीन दिवस अशीच परिस्थिती राहील असा हा अंदाज आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा परिसरात तीन दिवस हा पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . हा पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार होणार असल्याचा हा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य दक्षता घ्यावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांची मोठी नासाडी झालेली आहे आणि आता पुन्हा तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे पिकांना धोका उत्पन्न झाला आहे.  

पावसाचा हा अंदाज विचारात घेता शेतकरी बांधवानी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. पावसाची उघडीप होताच फवारणी आणि खते देण्याची कामे शेतकऱ्यांनी उरकून घ्यावीत असे आवाहन देखील पंजाबराव डख यांनी केले आहे. 

संभाव्य पावसाचा हा अंदाज विचारात घेतला तर पावसाचे हे एक संकट समोर दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसातील पावसामुळे शेतकरी आधीच धास्तावला आहे. काहीशी उघडीप मिळाल्याने शेतकरी समाधानी दिसतअसतानाच आता पुन्हा एकदा नवा अंदाज आला असून यामुळे पिके धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

Post a Comment

0 Comments