Breaking News

नव्या सरकारमध्ये CM फडणवीस तर एकनाथ शिंदे अर्थमंत्री? बंडखोरांतील २० जण होतील मंत्री

 नव्या सरकारमध्ये CM फडणवीस तर एकनाथ शिंदे अर्थमंत्री? बंडखोरांतील २० जण होतील मंत्री

सोलापूर : महाविकास आघाडीत नकोच म्हणत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी थेट पक्षप्रमुखांना शह दिला. आपल्याच पक्षाचा विशेषत: पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही केलेली आमदारांची बंडखोरी जिव्हारी लागल्याने उद्धव ठाकरे पदावरून पायउतार होतील, अशी स्थिती आहे. तत्पूर्वी, उद्या (गुरूवारी) सरकारला बहुमत सिध्द करावे लागणार आहे. पण, नवीन सरकार बनल्यास देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, गृहमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असतील. त्यांच्याकडेच अर्थमंत्रीपद असेल, असे बोलले जात आहे.


महाविकास आघाडीतील कृषी, नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी असे पाच कॅबिनेट मंत्री बंडखोरांच्या गोट्यात आहेत. तर बंडखोरी केलेल्यांमध्ये चार राज्यमंत्रीदेखील आहेत. पण, बहुमत सिध्द करण्यात महाविकास आघाडी सरकार अयशस्वी झाल्यास राज्यात सत्तापालट होऊ शकतो. त्यावेळी शिवसेनेतील विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांची (बंडखोर व इतर येण्यास इच्छुक असल्यास त्यंनाही) खांदेपालट होऊन त्यांना चांगला निधी असलेली खाती मिळतील, अशी शक्यता आहे. तर बंडखोरी केलेल्या शिवसेनेसह अपक्षांमधील ५० आमदारांपैकी (मंत्री सोडून) किमान २० जणांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, असेही बोलले जात आहे. 


राज्याच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) हाती दिल्या जातील. जेणेकरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या आमदारांच्या तुलनेत आमचा मुख्यमंत्री असतानाही तेवढा निधी दिला नाही ही खंत दूर होईल. भाजपकडून काही नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचा कारभार सांभाळताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सत्ता काळात गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवले होते. आता पण ते खाते स्वत:कडेच ठेवतील. मात्र, हे सगळे बदल होतील की नाहीत हे उद्याच्या (ता. ३०) बहुमत चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे.


नव्या मंत्रिमंडळात असतील ३६ कॅबिनेट मंत्री?

मुख्यमंत्री (गृहमंत्री), उपमुख्यमंत्री (वित्तमंत्री), उद्योग, सार्वजनिक बांधकाम, अन्न-नागरी पुरवठा, कामगार, जलसंपदा, मृद व जलसंधारण, वन, पर्यटन, पर्यावरण, कामगार, ग्रामविकास, अल्पसंख्यांक, महसूल, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा, शालेय शिक्षण, गृहनिर्माण, नगरविकास, पशुसंवर्धन, क्रिडा-युवक कल्याण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनवर्सन, पाणी पुरवठा व स्वच्छता, आदिवासी विकास, रोजगार हमी, सहकार व पणन, परिवहन व संसदीय कार्यमंत्री, वस्त्रोद्योग, महिला व बालविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय, ओबीसी, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण असे ३६ कॅबिनेट मंत्री नवीन मंत्रिमंडळात दिसतील, असेही सांगितले जात आहे. तर १० ते १५ जण राज्यमंत्री राहणार आहेत. जेणेकरून उर्वरित अडीच वर्षे सरकार व्यवस्थितपणे चालू शकेल, हा त्यामागील हेतू असेल.

Post a Comment

0 Comments