Breaking News

‘या’ विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणार खास मोहीम.. शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..!!

 ‘या’ विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणार खास मोहीम.. शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..!!


कोरोना काळात सर्वसामान्य घरातील अनेक मुलांनी शाळांना सोडचिठ्ठी दिली.. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढलंय.. ही बाब लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय..


शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी (ता. 23) एक ‘जीआर’ जारी केला. त्यानुसार, राज्यातील शाळाबाह्य मुलांना शोधण्यासाठी तब्बल 3 वर्षांनंतर शालेय शिक्षण विभाग खास मोहीम राबवणार आहे. त्याचं नाव आहे, ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’.. येत्या 5 जुलै ते 20 जुलैदरम्यान राज्यात ही शोधमोहीम राबवली जाणार आहे. त्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार असून, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. या अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी मार्च-2021 व त्याआधीही सर्वेक्षण केले होते. मात्र, त्यातून सर्व शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात दाखल झाले नाहीत. कोरोना काळात विद्यार्थी शाळा सोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यात वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे, विशेषतः मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे..


राज्यातील 3 ते 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा या मोहिमेद्वारे शोध घेतला जाणार आहे. ही माेहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध स्तरांवर समित्या नेमण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे राज्य, जिल्हा व ग्रामीण पातळीवर नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. राज्य स्तरावर 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या  आणण्याची जबाबदारी एकात्मिक व बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तावर सोपवली आहे. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण संचालक, तर 14 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी माध्यमिक शिक्षण संचालकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

कशी राबवणार मोहीम..?

जन्म-मृत्यू अभिलेखांमधील नोंदीचा वापर

तात्पुरते स्थलांतर झालेल्या कुटुंबांच्या भेटी

18 वर्षांपर्यंतच्या दिव्यांग बालकांचाही समावेश

येथे होणार ‘मिशन ड्रॉपआऊट’


शहरी भागातील रेल्वेस्थानके  बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर, स्थलांतरित कुटुंबे, बांधकामस्थळी, शेतमजूर वस्त्या आदी ठिकाणी.

ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार.

शाळाबाह्य मूल आढळल्यास गावस्तरावरील समिती, पालक व ग्रामस्थांच्या सहकार्याने विशेष नोंदणी मोहीम राबवावी, त्या मुलाला त्याच्या वयानुसार वर्गात दाखल करावे. ढोलताशांच्या गजरात दिंडी काढून ही माेहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments