रशियन सैनिकांनी भारतीय विद्यार्थीनींचं अपहरण केलं, त्यानंतर.., तरुणीने सांगितला भयानक अनुभव
कीव्ह - सात दिवस उलटून गेले तरीही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या दोन राष्ट्रांमधील युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे.
मात्र मंगळवारी खार्कीव्ह शहरात झालेल्या तोफमाऱ्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच ही जखम भारतासाठी ताजी असतानाच आणखी एका तरूणीने युक्रेनमधील भयानक अनुभव सांगितला आहे. उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरात राहणारी गरीमा मिश्रा ही विद्यार्थीनी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडली आहे. या तरूणीने तिथली धक्कादायक परिस्थिती एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे.
व्हिडिओत तरुणीने काय सांगितलं?
या व्हिडीओत ही तरुणी सांगते की, “सध्या आम्ही युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह शहरात अडकून पडलो आहे. त्यातच रशियन सैनिकांनी शहराला चहुबाजूंनी घेरलं आहे. इथे आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. आणि ही मदत आता आम्हाला मिळेल, अशी आशादेखील राहिलेली नाही. आम्ही भारतीय दुतावासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. पण ते आमचा फोन उचलत नाहीये. आमचा कुणाशीच संपर्क होत नाहीये. आम्ही इथे अडकून पडलो आहोत.”
'ते भारतीय विद्यार्थीनींना घेऊन गेले'
दरम्यान पुढे बोलतांना ही तरुणी म्हणतेय की, “आम्ही ज्या ठिकाणी राहतोय तिथे काल रात्री काही लोक आले, त्यांनी गोंधळ घातला, गेट तोडला आणि आत येण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथून कसंतरी ट्रेन, बस किंवा कारने बाहेर निघण्याचा विचार करत होतो. परंतू कारने बाहेर पडलेल्या भारतीय मुलांवर रशियन लष्कराने गोळीबार केला, त्यानंतर ते भारतीय विद्यार्थीनींचं अपहरण करत त्यांना घेऊन निघून गेलेत, त्यांनी त्या मुलींना कुठे नेलंय, याबद्दल काहीच माहिती मिळत नाहीये. तर, त्यांच्यासोबत असलेली मुलं कुठे गेलीत, याबद्दलही काहीच माहिती नाही,”
दरम्यान, कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे. युक्रेनमध्ये देशातील मुलींसोबत जे घडले ते भयावह आहे. पण त्याचवेळी पंतप्रधान मोदी निवडणुका जिंकण्यात व्यस्त होते, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
0 Comments