आबासाहेबांनी डोंगराएवढी कामे केली, निवडणूक स्वबळावर लढवू!
येणारी नगरपरिषदेची निवडणूक शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर लढवावी, असे मत शेकाप कार्यकर्त्यांच्या बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी बोलून मांडले
सांगोला (सोलापूर) : येणारी नगरपरिषदेची निवडणूक शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर लढवावी, असे मत शेकाप कार्यकर्त्यांच्या बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी बोलून मांडले. सांगोला (Sangola) येथील शेकाप कार्यालयात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या वेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. अनेक जणांनी ही निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, असे मत या बैठकीत मांडले. या बैठकीसाठी चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, चिटणीस विठ्ठल शिंदे, मारुती बनकर, सुरेश माळी, रफिक तांबोळी, राजू मगर, गोविंद माळी, अवधूत कुमठेकर, औदुंबर सपाटे, बाळासाहेब झपके, डॉ. महेश राऊत, बिरुदेव शिंगाडे, अजित गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीला मार्गदर्शन करताना चंद्रकांत देशमुख म्हणाले, येणारी शहरातील नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची आहे. कार्यकर्त्यांनी जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करून कामाला लागावे. कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करून येणारी निवडणूक सर्व ताकदीने लढवूया. स्वर्गीय आबासाहेबांनी शहरासाठी भीमा नदीचे पाणी आणले व इतर अनेक कामे केली आहेत. निवडणुकीत उमेदवार जनतेतून दिला जाईल. तो सर्वसमावेशक उमेदवार असेल. आबासाहेबांनी डोंगराएवढी कामे केले आहेत. शहरात शांतता, सुव्यवस्था राहण्यासाठी नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची आहे.
या वेळी मारुती बनकर, डॉ प्रभाकर माळी, सुरेश माळी, डॉ. महेश राऊत, बाळासाहेब बनसोडे, बाळासाहेब झपके यांनी विचार मांडले.
0 Comments