google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्याप्रमाणे सांगोल्यातही महाविकास आघाडी होईल का?

Breaking News

राज्याप्रमाणे सांगोल्यातही महाविकास आघाडी होईल का?

 राज्याप्रमाणे सांगोल्यातही महाविकास आघाडी होईल का?


सांगोला : सांगोला  नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य विविध पक्षांच्या युतीबाबत सामान्यांचे लक्ष असणार आहे. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या अगोदरच शिवसेना , कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस  यांच्या युतीची घोषणा झाली असली तरी शेकाप हा भाजपबरोबर युती करतो की स्वतंत्र निवडणूक लढविणार, हे पाहावे लागणार आहे. 

राज्यातील महाविकास आघाडीतील  सर्व प्रमुख पक्ष तालुका पातळीवर एकत्रित येणार का आणि एकत्र आले तर जागा वाटपाचे सूत्र काय असेल, हेही पाहावे लागणार आहे.नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची निवडणूक एकत्रित लढण्याची घोषणा झाली आहे. या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. झटके यांनी एकत्रित येत निवडणुकीसंदर्भात बैठक घेऊन 

नगरपरिषदेची निवडणूक आम्ही एकत्रितच लढवणार, असे जाहीरपणे सांगितले होते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर नगरपरिषदेची निवडणूक ही शेतकरी कामगार पक्षासाठी महत्त्वाची असणार आहे. शेकापची शहरात मोठी ताकदही आहे. पक्षात प्रत्येक निवडणुकीत कै. गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांचा शब्द अंतिम मानला जात होता. परंतु, त्यांच्या निधनानंतरच्या निवडणुकीत पक्षातील सर्वच नेतेमंडळींना सामूहिक नेतृत्वाद्वारे एकत्रित ही निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक नेतेमंडळींचा शेतकरी कामगार पक्षाबरोबर चांगला समन्वय झाला आहे.

 त्यामुळे या निवडणुकीत शेकाप व भाजप यांची युती होईल का, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत.शहर विकासासाठी प्रयत्न व्हावा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी एकत्र घेऊन युती करणारे किंवा आपल्या पक्षाचे नेतृत्व शहरात असावे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी प्रथम शहर विकासासाठी राजकारण सोडून एकत्रित आले पाहिजे. पक्षाचे अस्तित्व, सर्व बाजूंनी निवडून येणारे हे पाहण्यापेक्षा शहर विकासासाठी अभ्यास, विश्वासू, निरपेक्ष काम करणाऱ्या योग्य व्यक्तींची निवड केली जावी व त्यासाठी सर्वच पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे सुज्ञ व्यक्तींना वाटत आहे....तर निवडणूक एकतर्फी सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व या आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचाही पाठिंबा आहे.

 तालुक्‍यातील प्रमुख पक्ष हे राज्यात महाविकास आघाडीद्वारे एकत्रित आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात राज्याप्रमाणे स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शेकापमध्ये आघाडीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत व तशी संभाव्य आघाडी झाली तर सर्वच निवडणुका एकतर्फी व विकासाभिमुख होतील, असेही काही जण बोलत आहे.

Post a Comment

0 Comments