रुग्ण वाढणारी गावे होणार 'लॉक'! पाच तालुक्यातील निर्बंध होणार शिथिल
सोलापूर: जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, करमाळा, माढा व सांगोला या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने निर्बंध शिथिल झाल्यानंतरही त्याठिकाणी कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला. मात्र, तालुक्यात निर्बंध लागू करूनही रुग्ण कमी होत नसल्याने आता रुग्ण वाढत असलेली गावे लॉक केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर त्यावर सोमवारी निर्णय घेतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.
कोरोनाच्या दोन्ही लाटेतील शहर-ग्रामीणमधील रुग्णसंख्या दोन लाखांकडे वाटचाल करीत आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही साडेचार हजारांहून अधिक झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. सध्या साडेचार हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच ग्रामीणमधील पाच तालुक्यांनी प्रशासनाची डोकेदुखी वाढविली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
रुग्णांबरोबरच मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे, परंतु विविध उपाययोजना करूनही रुग्ण कमी होत नसल्याने आता रुग्णवाढीचे खापर बेशिस्तांवर फोडायला आता सुरवात झाली आहे. दरम्यान, काही गावांमध्येच रुग्ण वाढत असताना संबंध तालुक्यात निर्बंध का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने तालुका निर्बंधातून मुक्त करून रुग्ण वाढत असलेल्या गावांवर फोकस केला जाणार आहे.
पाच तालुक्यातील निर्बंध कडक करूनही रुग्ण कमी झालेले नाहीत. टॉप टेन गावांवर फोकस करून त्याठिकाणी कोरोना चाचण्या वाढविल्या आहेत. वाड्या-वस्त्यांवर रुग्ण वाढत असल्याने संपूर्ण तालुक्यात निर्बंध लावायचे की संबंधित गावांमध्ये निर्बंध ठेवायचे, याचा निर्णय सोमवारी होईल.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद
0 Comments