खळबळजनक...ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून होती, तो सपासप वार करत होता;
हातात चाकू, रक्ताने माखलेले कपडे अशा अवस्थेत तरुण पोलीस ठाण्यात गेला अन्.
सोलापूर : सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतमंगळवारी सकाळी एक थरारक आणि दुर्दैवी घटना घडली आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर चाकूने वार करून ठार केलं आहे.घटनेनंतर आरोपी थेट पोलिस ठाण्यात गेला आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
मृत महिलेचं नाव यशोदा सुहास सिद्धगणेश, तर संशयित आरोपीचं नाव सुहास तुकाराम सिद्धगणेश (रा. तळेहिप्परगा, सोलापूर) असं आहे.
ही घटनान्यू बुधवार पेठ, सोलापूर येथे मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, सुहास हा अनेक महिन्यांपासून पत्नी यशोदा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
त्यामुळे त्यांच्या नात्यात सतत वाद निर्माण होत होते. मंगळवारी सकाळी झालेलं भांडण इतकं चिघळलं की, सुहासने संतापाच्या भरात चाकू उचलला आणि पत्नीवर एकामागून एक वार केले.
घटनेदरम्यान यशोदाची बहीण अन्नपूर्णा बाळशंकर (वय 50) यांनी घरातून येणाऱ्या किंकाळ्या ऐकल्या आणि आत डोकावलं. त्यावेळी त्यांनी पाहिलं की, यशोदा लोखंडी पलंगाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे
आणि सुहास तिच्या पोटात व गळ्यावर वार करत आहे. त्यांनी आरडाओरडा करत यशोदाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, सुहासने "आमच्यात कोणी आला तर सर्वांना संपवीन!" अशी धमकी देत वार करतच राहिला.
काही वेळानंतर सुहास रक्ताने माखलेल्या चाकूसह घराबाहेर निघून गेला. अन्नपूर्णा यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावलं. यशोदाला रिक्षामधून सिव्हिल हॉस्पिटलयेथे दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.
घटनेनंतर सुहास थेट जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गेला आणि "मी पत्नीचा खून केला" अशी कबुली दिली. रक्ताने माखलेले कपडे आणि हातातील चाकू पाहून पोलिसही थक्क झाले.
पोलिसांनी सुहासला ताब्यात घेतलं असून खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेने सोलापूर शहर हादरले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


0 Comments