सांगोल्यातील सहा मंडलांत अतिवृष्टी: कृषी अधिकारी दीपाली जाधव; पिकांच्या पंचनाम्यांना सुरवात
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला तालुक्यात एकूण ९ मंडलांपैकी ६ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
अतिवृष्टी झालेल्या सहा मंडलांमध्ये तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून फक्त तीन मंडळे यातून वगळली आहेत.
तथापि नदी, ओढ्यांच्या लगतच्या पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेही पंचनामे करण्यात दिले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या
सांगोला तालुक्याला एवढ्या मोठ्या पावसाची सवयच नव्हती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिके वाया गेली आहेत.
अतिवृष्टी झालेल्या शिवणे, हातीद, सोनंद, महूद, कोळा व संगेवाडी या मंडळांमध्ये नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अनेक गावांमध्ये पंचनाम्यांना सुरुवातही झाली आहे.
तर सांगोला, जवळा आणि नाझरे या तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी न झाल्यामुळे सध्या पंचनामे होणार नाहीत.
तथापि, नदी-ओढ्यांमुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या गावांमध्ये स्वतंत्र पंचनामा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
तालुक्यात मका, बाजरी, डाळिंब, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घरांमध्ये व गायींच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरले आहे. नुकसानीचा अचूक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
आकडेवारीच्या खेळापेक्षा सरसकट मदतीची मागणी
सांगोला तालुक्यात यावेळी कधी नाही, एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. कोणत्या मंडलांत किती पाऊस झाला?
या आकडेवारीच्या खेळामध्ये सरकारने न पडता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत दिली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.


0 Comments