सांगोला-पंढरपूर रोडवर दुचाकीला कारची धडक; ३ मेंढपाळ तरुण ठार
सांगोला : सांगोला-पंढरपूर मार्गावर बामणी गावाजवळ कारची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात
निपाणी व चिकोडी तालुक्यातील तीन मेंढपाळ युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२) रात्री नऊच्या सुमारास घडली.
घटनेची नोंद सांगोला पोलिसात झाली आहे. दरम्यान या अपघातात तीन कर्ते-सवरते युवक गमावल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
बिरू नवलाप्पा कोळेकर (वय २२ रा.कोगनोळी ) विठ्ठल बिरू दिवटे (वय १७ रा. गायकवाडी, ता. निपाणी) व माळाप्पा महादेव धनगर (वय १७ रा. पट्टणकुडी ता.चिकोडी) अशी मृत झालेल्या
तीन मेंढपाळ युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे कोगनोळी, गायकवाडी, पट्टणकुडी या परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोगनोळी, गायकवाडी, पट्टणकुडी येथील महादेव धनगर, नवलाप्पा कोळेकर यांच्या बकऱ्यांचा कळप तनाळी (ता. पंढरपूर) येथे एका शेतात बसवला आहे.
दरम्यान कवठेमहांकाळ (जि.सांगली) येथे बिरोबा देवाची पालखी देवदर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी रविवारी सायंकाळी मयत तिघेजण दुचाकीवरून पंढरपूरकडून
सांगोला मार्गे जात होते. भरधाव वेगात आलेल्या कारने मागून त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भीमराव खंदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मयतांची ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली.
त्यानुसार नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले. रात्री उशिरा मृतदेहांचे सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात
शवविच्छेदन झाल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानुसार तिघांच्या मूळगावी सोमवारी (दि.३) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान बिरू धनगर (रा.पट्टणकुडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कार चालकाला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक खंदाळे करत आहेत.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विठ्ठल दिवटेचा मृत्यू
या अपघातातील मयत विठ्ठल दिवटे (रा. गायकवाडी) यांचा जन्म 3 जून 2003 साली जन्म झाला आहे.
सध्या तो निपाणी मुरगुड रोडला लागून असलेल्या श्री रेणुका मेडिकल शॉपमध्ये पार्ट टाइम जॉब करीत बीसीेएचे शिक्षण घेत होता.
विशेष म्हणजे सोमवारी त्याच्या वाढदिवसाचा मित्र परिवाराने बेत आखला होता. मात्र, वाढदिवस साजरा होण्यापूर्वी त्याला मृत्यूने कवटाळल्याने मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत तिघांपैकी दोघे एकुलते..
अपघातातील मयत माळाप्पा धनगर याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार असून तो अविवाहित होता. तर मयत बिरू कोळेकर हा एकुलता एक होता. त्याच्या पश्चात
आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. तर गायकवाडी येथील मयत विठ्ठल दिवटे हा एकुलता एक होता. तो सध्या निपाणी येथील एका नामांकित संस्थेत बीसीएचे शिक्षण घेत होता.
त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेत कर्त्या-सवरर्त्या तिघा युवकांना काळाने हिरावून नेल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.
0 Comments