झेडपी सीईओंचा नादच खुळा! 6 वर्षांपासून बंद जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना केली सुरु; आता लक्ष्य शिरभावी, भोसे, कासेगाव योजनेकडे; १६३ गावांचा सुटणार पाणीप्रश्न
सोलापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ७०हून अधिक टॅंकर सुरू आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत कामे पूर्ण झाल्यास व बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू झाल्यास दुष्काळातील टॅंकरवरील खर्चात बचत होईल
या हेतूने जिल्हा परिषदेच्या प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत.त्यांच्याच प्रयत्नातून २०१८मध्ये बंद पडलेली जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील उजनी धरणावरून १०० हून अधिक ग्रामपंचायतींचा व काही नगरपरिषदांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. जेऊर प्रादेशिक योजनेवर
२९ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तर सांगोल्यातील शिरभावी योजनेवर तब्बल ८२ गावांचा आणि पंढरपूरच्या भोसे
पाणीपुरवठा योजनेवर देखील ४० गावांचा आणि मंगळवेढ्यातील कासेगाव योजनेवर १२ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या योजना मागच्या दुष्काळापासून बंद आहेत.
पाइपलाइन जीर्ण झाली असून त्याची डागडुजी देखील झाली नाही. त्या योजनांच्या दुरुस्तीसाठी सीईओ आव्हाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून यापूर्वीच निधी मिळवला होता.
भोसे योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून कासेगाव योजनेचेही काम लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असलेली सांगोल्यातील शिरभावी योजना देखील सुरू व्हावी,
यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या दोन दिवसात सांगोल्याचा दौरा करणार आहेत. त्यानंतर त्या भोसे पाणीपुरवठा योजनेचाही आढावा घेणार आहेत.
१६३ गावांचा दूर होणार पाणी प्रश्न
लोकसभा निवडणुकीची सध्या आचारसंहिता सुरू आहे, पण दुष्काळी उपाययोजनांसाठी त्याचा अडथळा नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
त्याअनुषंगाने १६३ गावांचा पाणीप्रश्न सोडवणाऱ्या पण सध्या बंद पडलेल्या शिरभावी, भोसे, जेऊर व कासेगाव या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दुष्काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करायला लागू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी मनीषा आव्हाळे या प्रयत्न करीत आहेत.
दुष्काळातील पाणीटंचाई कमी करण्याचा प्रयत्न
दुष्काळामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पण, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
सुरू झाल्यास टॅंकरवरील खर्च कमी होऊन त्या गावाकऱ्यांना दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.
त्यासाठी जवळपास २५ लाखांचा खर्च करून जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा सुरू केली आहे. आता उर्वरित योजना देखील सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
0 Comments