खळबळजनक घटना...चहाच्या उधारीवरून भयानक घटना
चहा टपरीवरील उधारीच्या वादातून तीन जणांनी मिळून आपल्याच मित्राची निर्घृणपणे हत्या केली आहे. मनिष भालधारे (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला
असून त्यांना अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. संतोष मानकर, लोकेश मानकर, पवन मानकर, मोहित शेंडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तसेच या हत्येमध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याचे कुडवा येथे चहा नाश्त्याचे दुकान आहे.
मृत ईश्वर उर्फ मनीष याच्यावर आरोपी संतोष याचे काही पैसे उधारी होते. जेव्हा संतोष त्याला पैसे मागायचा, तेव्हा मनीष हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता.
याशिवाय तो संतोषला जीवे मारण्याची धमकीसुद्धा देत होता. दरम्यान, परवा रात्री संतोष आणि मनीषमध्ये पुन्हा उधारीच्या पैशांवरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला,
की रागाच्या भरात संतोष याने आपल्या मित्रांसोबत मनीषवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मनीषचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मनीषच्या हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर आरोपींच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली. रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली.
0 Comments