धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात?
ठाणे (प्रतिनिधी) -“आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर अनेक राजकीय भूकंप होतील आणि आम्ही मुलाखत घेतली तर अनेक गौप्यस्फोट आणि भूकंप होतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांचे काय झाले घात की अपघात? अश्या आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून राजकारण रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या दाै-यावर आहेत. यावेळी मालेगावमध्ये केलेल्या भाषणात ” माझी जर मुलाखत घेतली तर अनेक राजकीय भूकंप होतील. आमच्यावर जर सातत्याने आरोप केले जात असतील. आमचे आई बाप काढले जात असतील, आम्हाला गद्दार ठरवलं जात असेल तर मला देखील मुलाखत घेऊन तोंड उघडाव लागेल, भूकंप करावं लागेल असे मत मांडत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या मृत्यूचा मुद्दा मांडला होता.
त्यानंतर ठाण्यातील महेश परशुराम कदम या माजी नगरसेवकांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनर मध्ये “२६ ऑगस्ट २००१ ला नक्की आमच्या धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात? असा प्रश्न उपस्थित करत लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे” अशी मागणी केली आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यू घातपात असल्याचा आरोप यापूर्वी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांकडून करण्यात आला होता.आता एकनाथ शिंदे यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा दिघेंचा मृत्यू केंद्रस्थानी आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या बद्दल नक्की काय गौप्यस्फोट करणार? याकडे शिंदे गटासह, उद्धव ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकांसोबत इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्षं लागलं आहे. त्याचबरोबर लवकरच येऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आनंद दिघे यांच्या नावाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
0 Comments