Breaking News

राज्यात राजकीय संघर्ष पेटला; ‘या’ ठिकाणी जमावबंदीचे आदेश

 राज्यात राजकीय संघर्ष पेटला; ‘या’ ठिकाणी जमावबंदीचे आदेश

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते, मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बहुतांश आमदारांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ५० आमदारांचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान काही दिवसांपूर्वी सोडल्यानंतर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षातील सदस्यांसोबत बैठकांचा सपाटा लावला आहे. यानंतर शिवसैनिकांनी देखील आक्रमक भूमिका घेत काही आमदारांचे कार्यालय फोडले आहेत.तर काही ठिकाणी बॅनर लावले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत १४४ सीआरपीसी अनुसार जमावबंदीचे आदेश राज्याच्या पोलीस विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तसेच कुणीही कायदा हातात न घेण्याच्या राजकीय पक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत.


राज्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनुषंगाने मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्त यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री, खासदार , आमदार , नगरसेवक यांच्या कार्यलायाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राजकीय कार्यक्रमाच्या बंदोबस्त लावण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत देखील आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. आक्षेपार्ह पोस्टर, बॅनरवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय परिस्थितीचा प्रभाव दिसू शकतो, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ३० जून २०२२ पर्यंत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश लागू राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यकक्षेतील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांनी दि. ३० जून २०२२ अनेक कृत्यांना मनाई आदेश लागू केले आहेत.


ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी याच्या आदेशानुसार ३० जून २०२२ पर्यंत या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदूका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्याला मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची, फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. 


याशिवाय व्यक्तिचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे, तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किवा लोकांत प्रचार करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments