Breaking News

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.. केंद्रानं बदलला नियम; ग्राहकांवर होणार परिणाम

 रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.. केंद्रानं बदलला नियम; ग्राहकांवर होणार परिणाम

नवी दिल्ली : तुम्हीही रेशनकार्ड धारक असाल, तर ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने एका नियमात बदल केला आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल अनेक राज्यांत आणि काही केंद्र शास‍ित प्रदेशांत करण्यात आला आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांना पूर्वीच्या तुलनेत कमी गहू मिळेल.


केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ब‍िहार, केरळ आणि उत्‍तर प्रदेश या तीन राज्‍यांना मोफत व‍ितरणासाठी गहू दिला जाणार नाही. याशिवाय, द‍िल्‍ली, गुजरात, झारखंड, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, उत्‍तराखंड आणि पश्‍च‍िम बंगालमधील गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. तर उरलेल्या 25 राज्यांच्या कोट्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.


केंद्राने राज्यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की ‘मे ते सप्टेंबरपर्यंत सर्व 36 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच, गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदूळातून केली जाईल, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments