आज लस घ्यावीच लागेल ! निर्बंधामुळे तीन लाख जणांनी घेतला पहिला डोस
वर्ष संपत आले, तरीही बरेच विशेषत: तरुण कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेत नव्हते.
सोलापूर : जिल्ह्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचे 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे.वर्ष संपत आले, तरीही बरेच विशेषत: तरुण कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेत नव्हते. अखेर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढून लस टोचून न घेणाऱ्यांवरील निर्बंध कडक केले. त्यामुळे 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या 23 दिवसांत तब्बल तीन लाख तीन हजार 761 जणांनी पहिला डोस तर, पाच लाख दोन हजार 332 जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. उद्या (गुरुवारी) लसीकरणात पिछाडीवर असलेल्या 100 गावांमध्ये विशेष कॅम्प आयोजित करून दररोज किमान 50 हजार व्यक्तींचे लसीकरण होईल, असे नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 14) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील जवळपास 34 लाख 14 हजार 400 जणांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. त्यात ग्रामीणमधील 26 लाख 80 हजार 17 तर शहरातील सात लाख 34 हजार 383 जणांचा समावेश आहे. तरीही, जिल्ह्यातील सात लाख 33 हजार व्यक्तींनी अजूनपर्यंत लस टोचलेली नाही. नोव्हेंबरमध्ये लस टोचून न घेणाऱ्यांची संख्या दहा लाखांहून अधिक होती. लस शिल्लक असूनही विशेषत: त्यांच्या घरापर्यंत लसीकरणाची सुविधा दिली असतानाही अनेकजण लस टोचून घेत नसल्याची वस्तुस्थिती 'सकाळ'ने (Sakal) मांडली. त्यानंतर कायदेशीर जरी नसले, तरीही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लस टोचून न घेणाऱ्यांवरील निर्बंध कडक केले. त्यामुळे 23 दिवसांत तीन लाखांहून अधिक व्यक्तींनी पहिला तर पाच लाख दोन हजार 332 जणांनी दुसरा डोस टोचून घेतल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. दरम्यान, लसीकरण हे लोकहिताचे असून त्याला अडथळा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यंतची स्थिती
पहिला डोस टोचलेले : 3,03,761
दुसरा डोस टोचलेले : 5,02,332
पहिला डोस न घेतलेले : 7,33,006
लसीचे डोस शिल्लक : 2.49 लाख
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्याधिकारी व महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठोस नियोजन केल्याने लसीकरणात मोठी वाढ झाली आहे. दररोज सरासरी 20 ते 22 हजार लोक पहिला डोस टोचून घेत आहेत.
- डॉ. अनिरुद्ध पिंपळे जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर
निर्बंधात शिथिलता नाहीच
लसीचे दोन्ही डोस टोचून न घेणाऱ्यांना पेट्रोल -डिझेल , दारू, किराणा वस्तूंसह हॉटेलमध्ये जाण्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. निर्बंध कायदेशीर जरी नसले तरी लोकहितासाठी लागू केले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निर्बंधावर ठाम भूमिका घेतली असून सर्वांनी लस टोचून घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या गावांमध्ये लसीकरण कमी आहे, त्या ठिकाणी पालक अधिकारी नियुक्त करून डिसेंबरअखेर तेथील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 5 ते 10 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्वांनीच लसीचा पहिला डोस घेतलेला असावा, असे नियोजन करण्यात आले आहे.

0 Comments