मोठी बातमी..BRS चे मुख्यमंत्री केसीआर पंढरपूरातून करणार धमाका; संपूर्ण मंत्रीमंडळ येणार पंढरीत.
संपूर्ण मंत्रीमंडळ येणार पंढरीत. हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर करणार पुष्पवृष्टी
पंढरपूर आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम – महाराजांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्यांसोबत मोठ्या संख्येनं वारकरी आहेत.
अशातच या आषाढी वारीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात येणार आहेत.
त्यांच्यासोबत तेंलगणा सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील हजेरी लावणार आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ३००
गाड्यांच्या ताफ्यातून हे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात दाखल होणार आहे. के चंद्रशेखर राव हे २७ जूनला पंढरपूरला येतील. विठ्ठल दर्शनासोबत ते वारकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत.
खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दशमी दिवशी म्हणजे २८ जून रोजी पंढरपूरमध्ये येत असताना त्याच्या एक दिवस आधी चंद्रशेखर राव पंढरपुरात पोहोचणार आहेत.
आषाढीपूर्वीच पुण्यापासून सर्व पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून जोरदार होर्डिंगबाजी करण्यात आली आहे.
यातच आता खुद्द या पक्षाचे अध्यक्ष पंढरपूरला येणार असल्याने या आषाढी यात्रेत राजकीय वातावरण देखील तापणार आहे.
‘अब की बार किसान सरकार ‘ असे म्हणत बी आर एस पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या
आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे. आषाढी वारीसाठी गेले अनेक वर्षापासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग येत असतात.
पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आता संपूर्ण मंत्रिमंडळासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत.
पक्ष संघटना वाढीसाठी महासोहळ्याची निवड
देशात शेतकऱ्यांचे राज्य आणण्याची घोषणा देत कामाला लागलेले चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत.
यातच महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्यासाठी बीआरएसने वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठ्या महासोहळ्याची निवड केली आहे.
भालके यांची टीम स्वागतासाठी सज्ज
काही दिवसापूर्वी पंढरपूरचे भगीरथ भालके यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन बीआरएस पक्षात प्रवेश संदर्भात चर्चा केली होती. आता आषाढीला चंद्रशेखर राव येत असताना त्यांच्या स्वागतासाठी
भगीरथ भालके आणि त्यांची भलीमोठी टीम सज्ज असणार आहे. आता आषाढीला येणाऱ्या या राजकीय नेत्यांपैकी पंढरीचा पांडुरंग कोणाला पावणार? हे येणार काळच ठरवेल.
0 Comments