पतीचा अपघाती मृत्यू; सहाव्याच दिवशी पत्नीचे टोकाचे पाऊल, दोन्ही चिमुकले झाले अनाथ
मेहुणबारे (जळगाव) : पतीचा अपघातात मृत्यू झाल्याचा विरह सहन न झाल्याने पत्नीनेही पतीच्या मृत्यूनंतर सहाच दिवसांत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बहाळ (ता. चाळीसगाव) येथे घडली. या घटनेमुळे मात्र दोन चिमुकली मुले आई -वडिलांच्या प्रेमाला पारखी झाली आहेत.
बहाळ येथून लिंबू भरून मालवाहू वाहन १० डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास सुरतकडे जात होते. चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दहिवद फाट्याजवळ ट्रकने या वाहनाला धडक दिली. या अपघातात ट्रकचालकासह संदीप रामभाऊ पाटील (वय ३२, रा. बहाळ रथाचे) यांचा अपघातात मृत्यू झाला होता. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पतीच्या मृत्यूचा धक्का
सदर अपघातात संदीप पाटील यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांचा परिवार उघड्यावर पडला.
संदीप पाटील हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. पत्नी व दोन मुले असा त्यांचा छोटेखानी परिवार होता. पती अपघातात गेल्याने उज्ज्वला पाटील (वय ३०) या मनाने प्रचंड खचल्या. पतीचा विरह सहन न झाल्याने त्यांनी १६ डिसेंबरला पहाटे साडेसहाच्या सुमारास विषारी औषध सेवन केले.
हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी चाळीसगाव येथे आणत असतानाच त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. सात दिवसाच्या अंतराने पती व पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांची ७ व ९ वर्षांची दोन चिमुकले मुले मात्र मातृ-पितृ प्रेमाला कायमचे पारखे झाले आहेत.
0 Comments